तलाठीकडून अपमानास्पद वागणूक?
भद्रावती न्यूज डेस्क✍️
तहसील कार्यालय भद्रावती अंतर्गत साजा चिचौर्डी येथील तलाठी कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी गेलेल्या नवविधवा आशा योगेंद्र राय यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप समोर आला आहे. पतीच्या निधनानंतर अवघ्या एका महिन्यातच आर्थिक संकटात सापडलेल्या या महिलेने शासनाच्या योजनेचा आधार मिळावा म्हणून तलाठी कार्यालयाची पायरी चढली होती.
मात्र संबंधित तलाठींकडून “घराची रजिस्ट्री आणा” अशी अट घालत टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार आहे. आवश्यक कागदपत्रांबाबत स्पष्ट मार्गदर्शन न करता वारंवार हेलपाटे मारायला लावले जात असल्याने संबंधित महिलेची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.
दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण माजी नगरसेवक अफझल भाई यांच्याकडेही पोहोचले असून, त्यांनी प्रशासनासमोर याबाबत जाब विचारण्याची भूमिका घेतल्याची माहिती आहे.
या पार्श्वभूमीवर आता सर्वसामान्यांमध्ये एकच प्रश्न उपस्थित होत आहे . तहसीलदारांचे या प्रकाराकडे लक्ष आहे की नाही?
शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ पात्रांना वेळेत व सन्मानाने मिळावा यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.


