भाजयुमो चे प्रदेश सचिव इम्रान खान यांचा सबंधीत प्रशासनाला इशारा
भद्रावती न्यूज डेस्क✍️
शहरातील मुख्य बाजारपेठ आणि हनुमान नगर रोड (जुने वडाचे झाड परिसर) येथे गर्दीच्या वेळेत सुरू असलेल्या जड वाहनांच्या बेफाम वाहतुकीविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. “जड वाहनांना तात्काळ लगाम लावा; अन्यथा रस्त्यावर उतरू,” असा स्पष्ट इशारा संघटनेने प्रशासनाला दिला आहे.
भाजयुमोचे प्रदेश सचिव इम्रान खान यांनी तहसीलदार, भद्रावती यांना लेखी निवेदन सादर केले. मुख्य बाजार हा शहराचा सर्वाधिक वर्दळीचा भाग असून हनुमान नगर रोड परिसरात दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर दुकाने आहेत. सकाळ व संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि ग्राहकांची मोठी वर्दळ असताना हायवा, दहा चक्का यांसारखी जड वाहने सर्रास मार्गक्रमण करत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
जड वाहनांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असून रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण होते. स्थानिक व्यापाऱ्यांच्या मते, “एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का?” असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असताना प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रसंगी भाजयुमोने पुढील मागण्या केल्या आहेत, गर्दीच्या वेळेत जड वाहनांच्या प्रवेशास तात्काळ बंदी, वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस बंदोबस्त वाढवणे
या विषयावर तातडीची बैठक घेऊन अधिकृत आदेश जारी करणे, दीर्घकालीन वाहतूक नियोजन आराखडा तयार करणे
प्रसंगी प्रशासनाने तात्काळ निर्णय घेतला नाही तर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, शहरातील व्यापारी व नागरिक प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून असून, गर्दीच्या वेळेत जड वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस आणि तातडीचा निर्णय घेण्याची मागणी जोर धरत आहे.


