चंद्रपूर न्यूज डेस्क
१४ एप्रिल हा दिवस केवळ एका महान व्यक्तीच्या जन्माचा स्मरणदिन नाही तर तो भारतीय समाजव्यवस्थेला हादरा देणाऱ्या अन्यायाच्या मुळावर प्रहार करणाऱ्या आणि समतेचा ध्वज उंचावणाऱ्या क्रांतिकारी विचारांचा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव म्हणजे केवळ व्यक्तिमत्त्व नाही तर ते अन्यायाविरुद्धचा एल्गार, शोषितांच्या हक्कांसाठीचा ज्वालामुखी आणि सामाजिक क्रांतीचे प्रतीक आहे.
भारतीय समाजातील हजारो वर्षांची जातीय विषमता, अस्पृश्यता आणि सामाजिक गुलामी यांना उखडून टाकण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी केवळ विचार मांडले नाहीत तर त्या विचारांसाठी रस्त्यावर उतरून लढा दिला. महाडचा चवदार तळे सत्याग्रह असो किंवा नाशिकचा कालाराम मंदिर प्रवेश आंदोलन — प्रत्येक ठिकाणी त्यांनी अन्यायाच्या विरोधात उभे राहत समाजाला जागृत केले.
आजही प्रश्न उपस्थित होतो की बाबासाहेबांनी ज्या समतेच्या भारताचे स्वप्न पाहिले तो भारत आपण घडवू शकलो आहोत का? संविधानाने दिलेले हक्क कागदावरच राहिले नाहीत ना? सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विषमता आजही मोठ्या प्रमाणावर दिसून येते. ही वस्तुस्थिती आपल्या व्यवस्थेवर आणि राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण करते.
डॉ. आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले होते की “राजकीय लोकशाही टिकवायची असेल तर सामाजिक लोकशाही आवश्यक आहे.” परंतु आजच्या परिस्थितीत सामाजिक लोकशाही कितपत रुजली आहे हा गंभीर चिंतेचा विषय आहे. जातीच्या आधारावर राजकारण करणाऱ्या आणि समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्तींना अजूनही खतपाणी मिळत आहे. हे बाबासाहेबांच्या विचारांना विरोध करणारे आहे.
संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांनी भारताला एक मजबूत लोकशाही दिली. पण केवळ संविधान बनवणे पुरेसे नाही तर त्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे होणे आवश्यक आहे. आज अनेक ठिकाणी संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसते. अशा वेळी बाबासाहेबांचे विचार अधिक तीव्रतेने पुढे आणणे गरजेचे आहे.
बाबासाहेबांनी दिलेला “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश आजही तेवढाच प्रभावी आहे पण तो केवळ घोषणांपुरता मर्यादित राहू नये. शिक्षणाचा प्रसार, सामाजिक जागृती आणि संघटित लढा यांच्याशिवाय खऱ्या अर्थाने परिवर्तन शक्य नाही. समाजातील वंचित घटकांना केवळ आश्वासने नकोत तर त्यांना न्याय, संधी आणि सन्मान हवा आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी बाबासाहेबांनी केलेले कार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. आज महिलांच्या सुरक्षिततेचे आणि समानतेचे प्रश्न अजूनही कायम आहेत ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे स्त्री-पुरुष समानतेचे विचार आजच्या काळात अधिकच सुसंगत ठरतात.
आजच्या राजकीय परिस्थितीत बाबासाहेबांचे नाव घेतले जाते पण त्यांच्या विचारांचे पालन कितपत केले जाते हा मोठा प्रश्न आहे. केवळ जयंती साजरी करून पुष्पहार अर्पण करून आणि भाषणे देऊन बाबासाहेबांना अभिवादन करणे पुरेसे नाही. त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.
या जयंतीनिमित्त प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपण खरंच समतेच्या, न्यायाच्या आणि बंधुत्वाच्या मूल्यांना स्वीकारले आहे का? की अजूनही आपण जुन्या रूढी, भेदभाव आणि अन्यायाच्या चक्रात अडकून आहोत?
बाबासाहेबांचे विचार हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण राष्ट्रासाठी आणि मानवतेसाठी आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे आणि त्याला कृतीत उतरवणे ही आजच्या पिढीची जबाबदारी आहे. अन्यथा जयंती साजरी करणे ही केवळ एक औपचारिकता ठरेल.
चला.. या जयंतीनिमित्त आपण केवळ अभिवादन न करता परिवर्तनाचा संकल्प करूया. अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया समतेसाठी लढूया आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया.ॲड. राहुल थोरात
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई
जिल्हाध्यक्ष डिजिटल मिडिया, चंद्रपूर
मो. 8421318010
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


