गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवारही चर्चेत; मतदाराजा म्हणतो,
जागृत राहा..!
भद्रावती (प्रतिनिधी):
महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकांचे वातावरण तापले असून सर्वच पक्षांच्या प्रचार मोहिमा जोरात सुरू आहेत.
रॅली, सभांपासून सोशल मीडिया मोहिमांपर्यंत सर्वत्र निवडणुकीची लगबग वाढली असली तरी, स्थानिक पातळीवर काही गंभीर चर्चांनी मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे.
तसेच या निवडणूक प्रक्रियेत काही उमेदवार खरोखर सेवा करण्यासाठी मैदानात उतरले आहेत का की पक्षीय फंडातून लाभ घेण्याच्या उद्देशानेच उमेदवारी स्वीकारली आहे,
असा संशय प्रबळ होत आहे.
या संदर्भात काही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनीच फोनद्वारे अप्रत्यक्ष संकेत दिल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तसंच, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही उमेदवारांच्याही नावांचा उल्लेख स्थानिक चर्चांमध्ये वारंवार येत आहे.
काही उमेदवारांवर पूर्वी गुन्हे नोंद असल्याच्या चर्चेमुळे मतदार वर्गामध्ये अधिकच संभ्रम असणे म्हणजे दोष सिद्ध झालेला नाही, तरीही अशा उमेदवारांना तिकीट मिळाल्याने पक्षांच्या निवड निकषांकडे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
निवडणुकीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर मतदारांनी जागृत राहण्याची गरज अधिकच स्पष्ट होत आहे.
येथील नागरी संघटना आणि सामाजिक गटांनी आवाहन केले आहे की,
“उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे, शैक्षणिक पात्रता, आर्थिक स्थिती आणि गुन्हेगारी प्रकरणांची माहिती तपासूनच मतदान करा.”
प्रचार मोहीम वेगात सुरू असताना मतदारांमध्ये सेवा, पारदर्शकता आणि स्वच्छ प्रतिमेच्या नेतृत्वाची अपेक्षा वाढत चालली आहे.
समाजातील विविध घटकांमध्ये उमेदवारांच्या हेतूबाबत निर्माण झालेला संशय हा या निवडणुकीतील प्रमुख मुद्दा म्हणून उदयास येत असल्याबद्दल येथील चर्चेचा एक भाग दिसत आहे.


