भद्रावती (प्रतिनिधी):-शास्त्री नगरातील नालीवरील चेंबरचे झाकण तुटून अनेक दिवस उलटले असतानाही दुरुस्तीचे कोणतेही पाऊल नगरपरिषदेकडून उचलले गेले नसल्याने रहिवाशांचा संताप वाढत आहे. प्रभाग क्र. १४ मधील झोडे यांच्या घरासमोर असलेले चेंबर तुटल्यापासून ते उघड्यावर पडले असून, महिलांपासून ते मुलांपर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
सफाई करताना कामगारांच्या हातून चेंबरचे झाकण फुटले. परंतु, त्या तुटलेल्या झाकणाची पाटी बसवणे तर दूर, तात्पुरती संरक्षणव्यवस्था देखील नगरपरिषदेकडून करण्यात आली नाही. परिणामी दिवसाढवळ्या धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून, रात्रीच्या अंधारात अपघाताची भीती आणखीच वाढली आहे.
नागरिकांनी रोखठोक सवाल उपस्थित केला आहे…!
“चेंबर तुटलं… पण जबाबदारी कोणी घेणार? अपघात होईपर्यंत प्रशासनाला जाग येणार का?”
या दरम्यान स्थानिकांनी सांगितले की, या प्रश्नावर अनेक वेळा नगरपरिषदेकडे तक्रारी नोंदवल्या, परंतु ‘उद्या करू’, ‘लवकरच पाहतो’ अशा आश्वासनांपलीकडे काहीही झालेले नाही. परिणामी शास्त्री नगरकरांचा संताप शिगेला पोहोचला आहे.
या प्रसंगी ञउघड्या चेंबरमुळे परिसरात घाणीचा प्रश्नही निर्माण झाला असून, सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत आहे. मुलांचे खेळणे, नागरिकांची ये-जा, वाहनचालकांची अवजड वाहतूक
सर्व काही धोक्यात आहे.
तसेच नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की,
“दुरुस्ती नाही तर आंदोलन ठरलेले!”
शास्त्री नगरातील हा गंभीर प्रश्न तातडीने सोडवून मजबूत व सुरक्षित झाकण बसवावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर होणाऱ्या अपघाताची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच राहील, असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे.
- “To be continued” …!


