सामाजिक चळवळीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न?; चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात संतापाची लाट
चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️
Shankar Borghare
95 25 61 25 55
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे संस्थापक, राज्य संघटक तथा दैनिक जनप्रवासचे मालक संजय भोकरे यांच्या विरोधात रचण्यात आलेल्या कथित कटकारस्थानामुळे राज्यातील सामाजिक, पत्रकार आणि जनआंदोलन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे आवाज उठवणाऱ्या नेतृत्वाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
चंद्रपूर-गडचिरोली परिसरातील कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करत “सत्यासाठी लढणाऱ्यांना गप्प करण्याचा हा प्रयत्न आहे का?” असा सवाल उपस्थित केला आहे. जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “संजय भोकरे सर हे सामान्य माणसाच्या न्यायासाठी कायम लढणारे नेतृत्व आहे. पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली. अशा व्यक्तीविरोधात कट रचणे ही लोकशाहीसाठी धोक्याची बाब आहे.”
भोकरे यांनी दैनिक जनप्रवासच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, बेरोजगारी, शिक्षणातील गैरप्रकार, भ्रष्टाचार आणि प्रशासनातील त्रुटींवर सातत्याने प्रकाश टाकला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांना एकत्र आणत अनेक सामाजिक लढ्यांना दिशा दिली. संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोठे कार्य उभे केले आहे.
दरम्यान, सांगली पोलिसांनी या कथित कटप्रकरणी तिघांना शस्त्रांसह अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे राज्यभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, समर्थकांकडून निष्पक्ष आणि सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे. “हा केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून सामाजिक चळवळीला कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे,” असे मत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने भोकरे यांच्या समर्थनार्थ पुढे आले असून सोशल मीडियावर संजयभोकरे पाठीशी, निष्पक्षचौकशी, सत्यासाठी लढा अशा हॅशटॅगद्वारे समर्थनाची लाट निर्माण झाली आहे.
“सत्य दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही. भोकरे सरांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात आणि या प्रकरणातील संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे,” अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील सामाजिक आणि पत्रकार क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली असून, अनेक सामाजिक संघटना आणि पत्रकार संघटनांनी संयुक्त बैठका घेत पुढील आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांचा स्पष्ट इशारा आहे
“संघर्ष थांबणार नाही… सत्याचा आवाज दबणार नाही!”


