Friday, June 5, 2026
Homeभद्रावतीपाहणी झाली, फेरी झाली... पण पंचनामा मात्र "रस्ताच चुकला"?

पाहणी झाली, फेरी झाली… पण पंचनामा मात्र “रस्ताच चुकला”?

मौका चौकशीसाठी अधिकारी गेले, पण पंचनाम्याविना परतल्याची चर्चा; शेतकऱ्यांमध्ये संभ्रम…

भद्रावती, न्यूज डेस्क ✍️

मौजा विजासन येथील शेतकरी मधुकर खरवडे यांच्या शेतरस्त्याच्या प्रकरणाने महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. तहसील कार्यालय भद्रावती येथे दाखल असलेल्या या प्रकरणात सुनावणी झाली, आदेश झाले आणि अखेर मौका चौकशीचाही मुहूर्त निघाला.
ठरलेल्या दिवशी महसूल विभागाचे पथक विजासन येथे दाखल झाले. सोबत लिपिक, तलाठी आणि इतर कर्मचारीही उपस्थित होते. शेताची पाहणी झाली, रस्त्याची स्थिती तपासण्यात आली, परिसराची पाहणी करण्यात आली; मात्र ज्यासाठी संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी पोहोचली होती तो पंचनामा मात्र झालाच नसल्याची चर्चा आहे.

या प्रकारामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत असून काहींनी याला “महसूल विभागाची औपचारिक चौकशी” असे संबोधले आहे. तर काहींनी मिश्कील टिप्पणी करत, “मौका चौकशी झाली, पण नोंद कुठे झाली?” असा सवाल उपस्थित केला आहे.

शेतरस्ता प्रकरणात प्रत्यक्ष पंचनामा हा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. मात्र येथे पंचनाम्याचा मागमूसही नसल्याने नागरिक चक्रावले आहेत. काही जाणकारांच्या मते, हा कदाचित “पंचनामा-विरहित चौकशी” या नव्या प्रयोगाचा भाग असावा!
आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, पंचनामाच झाला नाही तर पुढील अहवाल नेमका कशाच्या आधारावर तयार होणार? की रस्ता पाहूनच कागदावर निष्कर्ष लिहिण्याची नवी पद्धत सुरू झाली आहे?
विजासन परिसरात सध्या एकच चर्चा रंगली आहे

“शेतरस्त्याचा निर्णय कधी होईल माहीत नाही, पण पंचनामा मात्र रस्त्यातच हरवला दिसतो!”

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!