भद्रावती तालुक्यात नवीन रेशन कार्ड धारक रेशनपासून वंचित; नागरिकांची नाराजी
भद्रावती न्यूज डेस्क ✍️
भद्रावती तालुक्यातील नवीन रेशन कार्ड धारकांना रेशन धान्य मिळण्यात अडचणी येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शासनाच्या अटींनुसार दरमहा रेशन वितरण होत असले तरी अनेक नवीन कार्डधारकांना कोटा उपलब्ध नसल्याने धान्य मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
तालुक्यातील काही कुटुंबांनी विभक्त झाल्यानंतर स्वतंत्र रेशन कार्ड काढले; मात्र नव्याने तयार झालेल्या कार्डांवर धान्य वितरणासाठी आवश्यक कोटा मंजूर न झाल्याने लाभ मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. परिणामी हातमजुरी व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
“चार वर्षांपासून रेशन कार्ड असूनही धान्य मिळत नाही. घरात लहान मुले आहेत; मजुरीवर घर चालवताना रेशनचा आधार मिळत नाही,” अशी व्यथा काही लाभार्थ्यांनी मांडली.
स्थानिक पातळीवर नवीन रेशन कार्ड धारकांसाठी स्वतंत्र धान्य कोटा मंजूर करण्यात यावा, तसेच वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. स्वस्त धान्य दुकानांमध्ये नियमित पुरवठा, मार्गदर्शन फलक आणि तक्रार निवारण व्यवस्था कार्यान्वित करावी, अशीही मागणी पुढे येत आहे.
या पार्श्वभूमीवर भद्रावती तालुक्यातील नवीन रेशन कार्ड धारकांना लवकरात लवकर न्याय मिळेल का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


