तालुक्यात अवैध उत्खननावर सवाल; भरारी पथक कुठे हरवलं?
चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️
तालुक्यातील पीपरी, जेना, पारोधी हे रेती घाट अधिकृत लिलावात गेले असल्याची नोंद असली, तरी चारगावची वर्धा नदी, जेना कोंढानाला, पारोधीची ईरई नदी आदी ठिकाणी चोवीस तास जेसीबी व हायवा यांच्या माध्यमातून उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याची चर्चा गावागावात रंगली आहे.
“घाट लिलावात गेले, पण रेती मात्र सर्वांसाठी खुली?” असा उपरोधिक सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
काही महिन्यांपूर्वी तालुक्यात विशेष भरारी पथक कार्यरत होते. एका पथकात मंडळ अधिकारी व तीन तलाठी असा समावेश होता. त्या काळात अवैध रेती वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात कारवाई झाली होती. गाड्या जप्त, दंड आकारणी, रात्री गस्त यामुळे प्रशासनाचा धाक बसल्याचे चित्र होते. शासनाला महसूलही मोठ्या प्रमाणावर मिळाल्याचे सांगितले जाते.
मात्र सध्याच्या घडीला तेच भरारी पथक बंद असल्याचे दिसत आहे. “भरारी पथकानेच भरारी घेतली का?” अशी हास्यास्पद चर्चा बाजारपेठेत ऐकायला मिळत आहे.
चारगाव,जेना, मांगली नाला, असे नाले आहेत, या भागांतून मोठ्या प्रमाणावर रेती वाहतूक होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. एका महसूल कर्मचाऱ्यीमार्फत चिरीमीरी जमा होत असल्याच्या अफवाही पसरल्या आहेत; मात्र याबाबत अधिकृत पुष्टी उपलब्ध नाही.
जिल्हास्तरावरून भरारी पथके सक्रिय ठेवण्याचे निर्देश असल्याचे सांगितले जाते. तरीही पथके का बंद? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठी हे पूर्वी कर्तव्यदक्षतेने कारवाई करत होते, असे नागरिक सांगतात. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर पावले उचलून अवैध उत्खननावर आळा घालावा, अशी मागणी होत आहे.
“रेतीचे डोंगर वाढतायत, पण कारवाईचे कागदच जड झालेत का?” असा टोला काही नागरिक मारत आहेत.
सध्या तालुक्यातील परिस्थिती पाहता, अवैध रेती उत्खननावर प्रभावी नियंत्रण येणार की चर्चा आणि अफवाच सुरू राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(सत्य बाहेर पडताच पुढील भाग ,, लवकरच)


