चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️
चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या अमृत योजना-2 मधील कामांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणावर भोंगळ व नियमबाह्य काम होत असल्याचा आरोप युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मनपा आयुक्तांना पुराव्यासह निवेदन देत दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
तसेच शहरात सुमारे २१८ कोटी रुपयांच्या खर्चातून १६० किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र कामाचा कालावधी पूर्ण होऊनही गेल्या दोन वर्षांत केवळ ६० किलोमीटरच काम पूर्ण झाल्याचा आरोप सहारे यांनी केला. या प्रकरणात मनपाने लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीवर २० लाख रुपयांचा दंड ठोठावला असला तरी केवळ दंडाची कारवाई करून प्रश्न सुटणार नाही, तर या भोंगळ कामाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान सहारे यांनी यापूर्वीही या प्रकरणी प्रशासनाला निवेदनासह दोन वेळा स्मरणपत्र दिले होते. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
प्रसंगी नियमांनुसार पाइपलाईन टाकताना किमान तीन फूट खोल खड्डा करणे आवश्यक असताना अनेक ठिकाणी फक्त दीड फूट खोलीत पाइप टाकण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच पाइपलाईन एकसंध टाकण्याऐवजी तुकड्यांमध्ये बसवण्यात आली, त्यामुळे भविष्यात पाणीगळतीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
याशिवाय शहरातील विविध भागांत उभारण्यात येणाऱ्या ८ पाण्याच्या टाक्यांचे काम अद्याप अपूर्ण आहे. पाइपलाईन टाकण्यासाठी नवीन रस्ते फोडण्यात आले असून अनेक ठिकाणी ते अद्याप दुरुस्त करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या संपूर्ण कामाची मनपा व जलप्राधिकरणाकडून योग्य पाहणी आणि चौकशीच झाली नसल्याचा आरोप सहारे यांनी केला. तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा युवासेना या भोंगळ कारभाराविरोधात आंदोलन उभारेल, असा इशारा विक्रांत सहारे यांनी दिला आहे.


