अवैध रेती तस्करी उघड केल्याची ‘शिक्षा’?; पत्रकारांचा संताप “आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न”
चंद्रपूर न्यूज डेस्क ✍️
चिमूर तालुक्यातील अवैध रेती तस्करी प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून, रेती माफियांना संरक्षण देण्यासाठी पत्रकारांवर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा थेट व गंभीर आरोप संबंधित पत्रकारांनी केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पत्रकारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्ही केवळ अवैध रेती तस्करीचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याची शिक्षा म्हणून आमच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले. हा सरळसरळ दबाव तंत्राचा भाग असून, पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे.”
अवैध रेती तस्करीचा मोठा खेळ; प्रशासन मात्र मौन, मिळालेल्या माहितीनुसार, चिमूर तालुक्यातील उमा नदी घाट, उसेगाव, सोनेगाव व गावंडे घाट परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. रात्रीच्या अंधारात नंबर प्लेट नसलेल्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून खुलेआम रेती तस्करी होत असल्याचा आरोप आहे., यामध्ये काही प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असल्याची चर्चा असून, त्यामुळेच प्रशासन या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. महसूल विभाग व पोलिस यंत्रणा गप्प बसल्यामुळे माफियांचे धाडस वाढल्याचेही चित्र आहे.
प्रत्यक्ष पाहणी; पत्रकारांना दिसला अवैध उपसा
प्रसंगी दिनांक २३ मार्च रोजी रात्री ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास उसेगाव घाटावर अवैध रेती उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पत्रकार घटनास्थळी पोहोचले. त्या वेळी नंबर प्लेट नसलेल्या दोन ट्रॅक्टरमध्ये मजुरांच्या साहाय्याने रेती भरली जात असल्याचे प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा करण्यात आला आहे.
या घटनेनंतर २४ मार्च रोजी संबंधित पत्रकारांनी नागपूर विभागाच्या आयुक्तांकडे व्हॉट्सअॅप व टेक्स्ट संदेशाद्वारे तक्रार नोंदवली.
दरम्यान तक्रार केल्यानंतर लगेचच फिर्यादीकडून पत्रकारांवर खंडणी मागितल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला. पत्रकारांच्या खात्यावर ५ हजार रुपये ऑनलाइन पाठवून खंडणीचा बनाव करण्यात आल्याचा आरोप पत्रकारांनी केला आहे.
याशिवाय पत्रकारांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, “ही संपूर्ण कारवाई पूर्वनियोजित असून आम्हाला गप्प बसवण्यासाठी आखलेले षडयंत्र आहे,” असे ठामपणे सांगितले.
या प्रकरणात पत्रकारांनी प्रशासनासमोर अनेक थेट प्रश्न उपस्थित केले आहेत:
अवैध रेती उपसा सुरू असताना कारवाई का करण्यात आली नाही? नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कोणाचे संरक्षण आहे?, घटनास्थळाचा पंचनामा का करण्यात आला नाही?
दोन्ही बाजूंची पडताळणी न करता गुन्हे का दाखल करण्यात आले?
राजकीय दबावाखाली कारवाई झाली का?
“पत्रकार गप्प बसणार नाहीत” इशारा…!
पत्रकारांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,
“सत्य मांडणे हा आमचा कर्तव्य आहे. कोणत्याही दबावाला न जुमानता आम्ही आमचे काम करत राहू. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही.”
तसेच पत्रकारांवर दाखल गुन्हे तात्काळ रद्द करावेत, खोट्या तक्रारदारांवर कठोर कारवाई करावी, अवैध रेती तस्करीवर तातडीने अंकुश लावावा, प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करावी, तणावपूर्ण वातावरण; चौकशीची गरज या मुख्य मागण्या आहेत
या संपूर्ण प्रकरणामुळे चिमूर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सत्य परिस्थिती समोर आणण्यासाठी प्रशासनाने तात्काळ निष्पक्ष चौकशी करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.


