भद्रावती (न्यूज डेस्क) ✍️
गवराळा येथील प्रभाकर उंबरकर यांचं जमीन फेरफार प्रकरण तब्बल नऊ महिने तहसीलमध्ये धूळ खात पडलं होतं. कागदपत्रं सगळी फिट असताना सुद्धा काम पुढे सरकत नव्हतं. पण एकदा प्रकरण बाहेर आलं आणि पाठपुरावा सुरू झाला, की तहसीलचं चित्रच बदललं. अखेर उंबरकरांचं प्रकरण मार्गी लागलं आणि मंजुरीचा शिक्का बसला.
सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या, कागदपत्रं नीट असलेली, तरी सातबारा उताऱ्यावर नाव चढत नव्हतं. त्यामुळे उंबरकर कुटुंब हैराण झालं होतं. “काम झालंय तरी नोंद का होत नाही?” हा प्रश्न सगळ्यांच्या तोंडी होता.
याच वेळी भाजयुमोचे प्रदेश सचिव इम्रान खान सरळ तहसीलमध्ये धडकले. फाईल उघडून पाहणी केली, अधिकाऱ्यांना सरळ विचारलं
“हे प्रकरण एवढे दिवस का अडवलं?” त्यांच्या या धडाकेबाज स्टाईलमुळे तहसीलमध्ये एकच खळबळ उडाली.
प्रकरण तिथेच थांबलं नाही. इम्रान खान यांनी लगेच माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांना माहिती दिली. मुनगंटीवारांनी सुद्धा वेळ न घालवता थेट प्रशासनाशी संपर्क साधला आणि स्पष्ट सांगितलं “प्रकरण लगेच निकाली काढा.”
बस्स! एवढं झालं आणि तहसील हलली. फाईल्स हलल्या, कागद तपासले गेले आणि उंबरकर प्रकरणाला अखेर मंजुरी मिळाली.
आता सातबारा उताऱ्यावर नाव चढवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, उंबरकर कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. “न्याय मिळाला” अशी भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते.
हे प्रकरण एक गोष्ट स्पष्ट करून गेलं
कागदपत्रं पूर्ण असली तरी काम वेळेत झालंच पाहिजे
आणि कोणी पाठपुरावा केला तरच प्रशासन हलतं
पुढचा भाग येतोय…!
हे फक्त सुरुवात आहे…
हे प्रकरण इतके दिवस अडकलं कसं?
कोणत्या टप्प्यावर ब्रेक लागला होता?
याचा सगळा उलगडा पुढच्या भागात…!


