Friday, June 5, 2026
Homeचंद्रपूरबल्लारपूरातील वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांचा अंकुश; ‘बादल हरणे’ टोळीतील तिघांना एक वर्षाची जिल्हाबंदी

बल्लारपूरातील वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांचा अंकुश; ‘बादल हरणे’ टोळीतील तिघांना एक वर्षाची जिल्हाबंदी

बल्लारपूरातील वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांचा अंकुश; ‘बादल हरणे’ टोळीतील तिघांना एक वर्षाची जिल्हाबंदी

चंद्रपूर न्यूज डेस्क ✍️

बल्लारपूर शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या दहशतीच्या वातावरणाला अखेर चंद्रपूर पोलिसांनी जोरदार उत्तर दिले आहे. वारंवार गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या कुख्यात ‘बादल हरणे’ टोळीवर कठोर कारवाई करत टोळीतील तिघांना एक वर्षासाठी जिल्हाबंदीचे आदेश बजावण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.

मा. पोलीस अधीक्षक यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत प्राप्त विशेष अधिकारांचा वापर करून ही कारवाई केली. तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये टोळी प्रमुख बादल वसंता हरणे (वय २२), यासिन अहमद सिद्दीकी (वय २९) आणि योगेश शंकर येरोल (वय २६) यांचा समावेश आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीविरुद्ध खून, दंगल घडवणे, शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्या देणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. बेकायदेशीर मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्यासाठी टोळी सक्रिय होती. वारंवार गुन्हे करून सार्वजनिक शांतता भंग करण्याबरोबरच परिसरात दहशत निर्माण करण्याचे काम ही टोळी करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

यापूर्वी संबंधित आरोपींवर विविध प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या. मात्र त्यांच्यात कोणतीही सुधारणा दिसून आली नाही. उलट त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी हालचालींमुळे बल्लारपूर शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अखेर पोलिसांनी तडीपारीचा कठोर निर्णय घेतला.

ही धडक कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यांनी केली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक , तसेच बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने मोलाची कामगिरी बजावली.

दरम्यान, चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे. तसेच नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती तातडीने पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!