पूर्वीच्या चुकीच्या नियोजनाचा फटका; मात्र नगराध्यक्ष प्रफुल चटकींनी स्वीकारली पाणीप्रश्न सोडविण्याची जबाबदारी
भद्रावती, न्यूज डेस्क ✍️
भद्रावती शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना सध्या मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असला, तरी शहराच्या दीर्घकालीन पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्ष यांनी पुढाकार घेत ठोस उपाययोजना सुरू केल्या आहेत. अमृत २.० पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या महत्त्वाच्या कामांमुळे तात्पुरत्या अडचणी निर्माण झाल्या असल्या, तरी भविष्यात शहराला मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
अमृत २.० योजनेअंतर्गत भद्रावती शहरासाठी नवीन पाण्याच्या टाक्या, वर्धा नदी पात्रातील विहिरी, जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचविणारी यंत्रणा तसेच नवीन पाईपलाईन जोडणीची कामे सुरू आहेत. मात्र या योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात झालेल्या तांत्रिक त्रुटी आणि काही महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आज शहराला त्याचा फटका बसत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.
विशेषतः वर्धा नदी पात्रातील कामांना योग्य वेळी प्राधान्य न दिल्याने आता उन्हाळ्यात तातडीने मोठ्या प्रमाणावर काम करावे लागत आहे. दरम्यान, नदी पात्रात पाईपलाईन जोडणीचे काम सुरू असताना माती खचल्याने कामगारांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नगराध्यक्ष यांनी स्वतः घटनास्थळी पाहणी करत सुरक्षेला प्राधान्य देत तातडीने काम थांबविण्याचे आदेश दिले.
यानंतर माती हटविणे, सुरक्षाविषयक उपाययोजना करणे आणि काम पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर राबविण्यात आली. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होण्यास काहीसा विलंब झाला असला, तरी संभाव्य जीवितहानी टळल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.
नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनी सांगितले की, “आज नागरिकांना काही दिवसांचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील २५ वर्षे भद्रावतीकरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही. भविष्यातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.”
ते पुढे म्हणाले, “पावसाळा आणि हिवाळ्यात वर्धा नदी पात्रात पाणी भरलेले असल्यामुळे हे काम करणे शक्य नव्हते. उन्हाळ्यात संधी मिळताच रखडलेले काम हाती घेण्यात आले. शहराच्या भविष्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे.”
दरम्यान, शहरातील अनेक नागरिकांनीही या भूमिकेचे समर्थन करत “तात्पुरता त्रास झाला तरी भविष्यातील पाणीटंचाई कायमची संपली पाहिजे,” अशी भावना व्यक्त केली आहे. प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून लवकरच नियमित पाणीपुरवठा सुरू होईल, असा दावा करण्यात आला आहे.


