निकाल जाहीर करण्यात उशीर, मतदारांमध्ये नाराजी..!
भद्रावती (प्रतिनिधी):-भद्रावती नगरपरिषद निवडणूक २०२५ साठीची मतदान प्रक्रिया मंगळवारी शांततेत पूर्ण झाली. एकूण ५२,५७२ मतदारांपैकी ३१,८३६ मतदारांनी आपला मताधिकार बजावत ६०.५६% मतदानाची नोंद केली. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणतीही गंभीर तक्रार नोंदली गेली नसल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.
शासकीय आकडेवारीनुसार, महिला आणि पुरुष मतदारांचा सहभाग जवळपास समान राहिला. २६,०१५ महिला मतदारांपैकी १५,६६० (६०.२०%), तर २६,५५७ पुरुषांपैकी १६,१७६ (६०.९१%) मतदारांनी मतदान केले. काही प्रभागांमध्ये ७०% ते ७५% इतका वाढीव मतदान टक्का नोंदला गेला.
प्रसंगी मतदानानंतर सर्व EVM मशीन, VVPAT, कागदपत्रे व नोंदी नियमांनुसार सील करून स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. परिसरात २४ तास सीसीटीव्ही देखरेख व पोलीस बंदोबस्त कायम असून, निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, निकाल जाहीर करण्यात उशीर होत असल्याबद्दल मतदारांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. शहरातील अनेक प्रभागांतील कडवी लढत पाहता निकालाबाबत उत्सुकता वाढली असून मतदारांकडून अधिकृत निकाल लवकर जाहीर करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
निवडणूक विभागाने अनधिकृत बातम्या किंवा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.


