पेट्या आल्या की लगेच चिल्लर विक्री; गावकऱ्यांची खळबळ!
भद्रावती,न्यूज डेस्क ✍️
भद्रावती तालुक्यात सध्या एका आगळ्यावेगळ्या “रात्रीच्या सेवे”ची चर्चा इतकी रंगली आहे की चहाच्या टपऱ्यांपासून शेताच्या बांधापर्यंत एकच विषय “बाटली राज पण्या”! म्हणे, देशीच्या पेट्या आधी पोहोचतात आणि दुसऱ्या दिवशी चिल्लर विक्रीचा ‘काउंटर’ आपोआप सुरू होतो!
ग्रामस्थांच्या कथनानुसार, हा पण्या कधी वरोरा वरून तर कधी भद्रावतीतून देशी बनावट दारूच्या पेट्या आणतो, आणि त्या पेट्या जणू काही जीपीएस लावल्यासारख्या अचूक गावात पोहोचतात. गावात रस्ते चुकतात, बस उशिरा येते; पण या पेट्या मात्र वेळेवर! त्यामुळे काही जण उपरोधिकपणे म्हणतात, “इतकी अचूक सेवा तर कुरिअरवाल्यांनाही जमत नाही!”
विलोडा, मुधोली, कोंडेगाव, सिताराम पेठ, वायगाव चोरा, मोहुर्ली, बेलगाव आणि चिचोली परिसरात या कथित हालचालींची रंगतदार चर्चा सुरू आहे. “पेट्या आधी, विक्री नंतर” हा फॉर्म्युला इतका अचूक कसा? असा सवाल ग्रामस्थ विचारताना दिसतात. काहींची टोलेबाजी तर आणखीच भन्नाट“रात्री पेट्या उतरतात आणि सकाळी गावात ‘विशेष ऑफर’ सुरू होते काय?”
मात्र, या हास्यास्पद चर्चेमागे गंभीर प्रश्न दडलेला आहे. जर विनापरवाना बनावट देशी दारूची चिल्लर विक्री खरोखरच होत असेल, तर तो गंभीर गुन्हा ठरतो. अशा दारूमुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते, जीवितासही धोका संभवतो. त्यामुळे हा विषय केवळ विनोदापुरता मर्यादित नसून तपासाची गरज स्पष्ट करतो.
दरम्यान, प्रशासनाच्या नजरेआड इतकी ‘सुरळीत लॉजिस्टिक सेवा’ कशी काय चालते? हा प्रश्न गावोगावी चर्चिला जात आहे. अफवा असल्यास स्पष्ट खुलासा व्हावा; आणि जर कथित पेट्या खरोखरच पोहोचत असतील, तर छापेमारी करून साखळी उघड व्हावी, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे.
तोपर्यंत मात्र भद्रावतीत “पेट्या पोहोचल्या की लगेच चिल्लर विक्री” ही गोष्ट लोककथेसारखी पसरत असून, ‘बाटली राज पण्या’च्या या रहस्यमय साखळीमागील खरे सूत्रधार कोण? याचीच सर्वांना उत्सुकता आहे.
(पेट्यांचा मार्ग आणि मास्टरमाईंडचा शोध ,पुढील भागात…)


