ऐन वस्तीतील घनकचरा प्रकल्पाला ग्रामस्थांचा कडाडून विरोध; आंदोलनाचा इशारा
चंद्रपूर, न्यूज डेस्क ,
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,
जिल्हा शाखा चंद्रपूर
राजुरा तालुका अध्यक्ष
✍️ अनंत डोंगे
राजुरा तालुक्यातील रामपूर ग्रामपंचायत हद्दीत ऐन वस्तीमध्ये उभारण्यात येत असलेल्या घनकचरा संकलन व साठवणूक प्रकल्पावरून ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. “आरोग्याशी खेळ चालणार नाही!” अशी ठाम भूमिका माता मंदिर वार्ड क्र. १ मधील नागरिकांनी घेतली आहे.
माथरा रोड, रामपूर येथे सुरू असलेले बांधकाम रहदारीच्या मार्गावर आणि दाट लोकवस्तीमध्ये होत असल्याने परिसरात नाराजीची लाट उसळली आहे. भविष्यात दुर्गंधी, माशा, डास आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. “कचरा प्रकल्प हवा, पण तो वस्तीमध्ये नको!” असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पाबाबत ग्रामपंचायतीने कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. सूचना फलकावर नोटीस नाही, ग्रामसभेत चर्चा नाही, आणि काही सदस्यांनाही माहिती नाही .
मग हा निर्णय नेमका कोणी आणि कसा घेतला? असा प्रश्न आता गावभर चर्चेत आहे. पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी पंचायत समिती राजुरा येथील गटविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत बांधकाम तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. तसेच गावाच्या हद्दीबाहेर, किमान तीन किलोमीटर अंतरावर, वस्ती नसलेल्या ठिकाणी ग्रामसभा घेऊन सर्वानुमते जागा निश्चित करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
“गाव स्वच्छतेच्या नावाखाली आमच्या आरोग्याशी तडजोड मान्य नाही. निर्णय मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
आता प्रशासन या संतप्त भावना लक्षात घेऊन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण रामपूर परिसराचे लक्ष लागले आहे.
कचरा प्रकल्प होणार का हलणार? की आंदोलनाची ठिणगी पेटणार? पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष!


