नागरिकांचा संताप उफाळला; रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर..
चंद्रपूर न्यूज डेस्क ✍️
राजुरा, ॲड. राहुल थोरात
शहरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात सध्या अंधाराचे साम्राज्य पसरले असून, अत्यावश्यक सेवास्थळ असतानाही प्रकाशव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
रात्रीच्या वेळी रुग्णालय परिसरात प्रवेश करणे म्हणजे धोक्याचा प्रवास ठरत आहे. मुख्य प्रवेशमार्ग, पार्किंग परिसर आणि इमारतीसमोरील रस्ता पूर्णतः अंधारमय असल्याने रुग्णांना अक्षरशः अंदाजाने चालावे लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
परिसरात वीजखांब असूनही दिवे बंद अवस्थेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे ही केवळ तांत्रिक बिघाडाची बाब नसून, प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.
रुग्णालय हे नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित केंद्र असताना अशा मूलभूत सुविधांचाही अभाव असणे ही गंभीर बाब मानली जात आहे. अंधारामुळे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला असून, कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांचा संताप उफाळला असून, संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रुग्णालय परिसरात प्रकाशव्यवस्था सुरळीत करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
रुग्णालयातच अंधार असेल, तर नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर?


