“नाम्या ते सुलेमान भाई; गावच्या सेटलमेंटचा बादशाह!”
एक सुचक कथा..!
गावात एकेकाळी नाम्या म्हणजे साधा, भोळा, कुणाच्याही वादात न पडणारा माणूस. पण काळ बदलला… आणि नाम्या झाला “सुलेमान भाई सेटलमेंट स्पेशालिस्ट!”
गावात कुठेही दारू विक्रीवरून भांडण झाले की, आधी पोलीस नाही… आधी फोन जातो नाम्याला!
“भाई, जरा या ना… मामला गरम आहे!”
नाम्या आधी चहा घेतो, मग हळूच गमछा खांद्यावर टाकतो आणि म्हणतो,
“घाबरू नका… भाई आहे ना!”
एका दिवशी दोन जण दारूच्या बाटलीवरून भिडले.
एक म्हणे, “ही माझी उधारी!”
दुसरा म्हणे, “मी आधी बुकिंग केली होती!”
गावात गोंधळ, लोकांची गर्दी… तेवढ्यात नाम्या एन्ट्री!
“शांत व्हा रे शांत! आधी भाई बोलू दे…”
दोघांचेही ऐकून घेतो, मध्येच डोळे मिटून विचार करतो (जणू काही मोठा भा ई).
आणि शेवटी निकाल देतो
“उधारी अर्धी-अर्धी… आणि पुढच्या वेळी भांडण नाही. भाईचा शब्द अंतिम!”
लोक टाळ्या वाजवतात.
कोणी म्हणतं, “आपला नाम्या आता भाई झालाय!”
कोणी म्हणतं, “याला पंचायतमध्ये बसवायला पाहिजे!”
हळूहळू गावात म्हण प्रचलित झाली
“जिथं दारू, तिथं भांडण… आणि जिथं भांडण, तिथं सुलेमान भाई हजर!”
पण गंमत अशी की, सेटलमेंट झाल्यावर भाईला “चहापाणी” मिळायलाच हवं!
मग भाई हसत म्हणतो
“मी काही घेत नाही रे… लोक प्रेमाने देतात!”
आता गावात पोलिसांपेक्षा भाईचा धाक जास्त.
गावात कुणी वाद सुरू केला की लोक म्हणतात,
“ए… जपून! नाहीतर सुलेमान भाईला बोलावू!”
आणि नाम्या आरशात बघून मिशीला ताव देतो…पण नाम्या मीशीच नसते
मनात म्हणतो
“नाम्या गेला… आता गावात फक्त नाम्या भाई ..चालतो!”
—
सूचना: वरील कथा ही पूर्णपणे काल्पनिक व सुचक स्वरूपाची आहे. कोणत्याही प्रत्यक्ष व्यक्ती, घटना किंवा संस्थेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


